जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. भुसावळ शहरातील नारायण नगरातील रहिवासी अरूण जाधव यांचा मुलगा धीरज अरूण जाधव (वय ३२) हा दिव दमणला फिरायला गेला होता. तेथे धिरजचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निवृत्त सहायक फौजदार अरूण जाधव यांचा मुलगा धीरज हा मंगळवारी दिव दमणला त्याचा चुलत भाऊ भूषण व अविनाश जाधव व अन्य दोन मित्र असे पाच जण गेले होते. तेथे दि. ३ एप्रिलला रात्री ९.४५ वाजता नानी दमणला सुरथी आम्लेट ढाबा येथे जेवणाला गेले होते. तेथे सुरत येथील युवकासोबत वाद झाला असता, त्या युवकाने धिरजच्या मानेवर चाकूने वार केला. यात त्याची एक नस कापली गेली. धिरजवर प्राथमिक उपचार करून त्याला दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये नेत असतांनाच रक्ताच्या उलट्या झाल्या. यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अरूण जाधव यांनी दिली.
तीन वर्षापूर्वीच धीरजचा विवाह झाला होता. धीरज पुणे येथे एका नामांकित कंपनीत अभियंता होता. तो वर्कफॉर्म होम करीत होता. दिवदमण येथून त्याचा मृतदेह आणल्यावर त्यांच्यावर गुरूवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक झालेल्या धिरजच्या मृत्यूमुळे कुटुंबातील सदस्यांंनी एकच आक्रोश केला.