जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यातील महायुतीमध्येच बिघाडी होत असल्याची चर्चा सुरू असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अनपेक्षित भेट झाल्याने नवे राजकीय संकेत मिळत आहेत. संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याला काल अनेक प्रतिष्ठित राजकीय नेते उपस्थित होते. त्यात देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचादेखील समावेश होता. याच विवाहसोहळ्यात संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर भेट झाली. सध्या दोन्ही गटांमध्ये तीव्र राजकीय विरोध असताना झालेल्या या भेटीने चर्चांना अधिक उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या भेटीत दोन्ही नेत्यांनी जवळपास 15 मिनिटे हसत-खेळत संवाद साधल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या प्रकृतीत अचानक घसरण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती आणि डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्लादेखील दिला होता. त्यामुळे ते काही काळ राजकीय कामकाजापासून दूर राहिले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत अपेक्षेपेक्षा लवकर सुधारणा झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत त्यांनी मर्यादित स्वरूपात काही कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी भेट देत परिस्थितीची चौकशी केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीही माध्यमांशी संवाद साधताना, संजय राऊत लवकरच राजकीय क्षेत्रात पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास व्यक्त केला होता.
राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नात झालेली भेट केवळ शिष्टाचारापुरती होती की त्यामागे काही राजकीय चर्चा झाली? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस यांनी राऊत यांच्या प्रकृतीचा विशेष उल्लेख करत त्यांची तब्येत कशी आहे? याबाबत सविस्तर चौकशी केली. दोन्ही नेत्यांमध्ये या काळात झालेल्या राजकीय घटनांचीही थोडीफार चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या दरम्यान आशिष शेलार हे दोघांच्या जवळ उपस्थित राहिले. त्यामुळे ही भेट पूर्णपणे सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असल्याचे स्पष्ट होते. मात्र या दोन्ही नेत्यांच्या चर्चेची माहिती अधिकृतरित्या उघड करण्यात आलेली नाही. पण दोघेही राजकारणातील अनुभवी खेळाडू असल्याने फक्त गप्पा असा निष्कर्ष राजकीय वर्तुळ काढण्यास तयार नाही.
ज्या सोहळ्यात ही भेट झाली, त्याच कार्यक्रमात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. परंतु, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की नाही, याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती आली नाही. विशेष म्हणजे, संजय राऊत यांनी अलीकडील काळात फडणवीस यांच्यावर आणि राज्य सरकारच्या धोरणांवर कडक टीका केली आहे. तर फडणवीस यांनीही ठाकरे गटावर अनेकदा राजकीय हल्ले चढवले आहेत. त्यामुळे एका मैत्रिणीच्या नातेसंबंधामुळे झालेली ही भेट राजकीय सौम्यतेची नवी सुरुवात ठरेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समर्थक आणि विरोधक स्वतःच्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावण्यात गुंतले आहेत.




















