जळगाव मिरर | २२ जून २०२४
राज्यात सध्या ओबीसी- मराठा संघर्ष पेटलेला असून सरकारकडून याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांनीही मराठा- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीतून मार्ग काढू असे म्हंटले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या वादावर सर्वपक्षीय चर्चा हाच मार्ग असल्याचे म्हणत चर्चेची मागणी केली आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ”आम्ही ओबीसी आंदोलकांना त्यांची तब्येत खालावत असल्याने विनंती केली. तुमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला पाठवा असे आम्ही त्यांना सांगितले. वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांचे मी काल मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. तसेच काल जालना आणि पुण्याचे शिष्टमंडळ देखील सोबत होते. आमची अतिशय सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाली”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
याप्रकरणी येत्या अधिवेशनात आम्ही सर्वपक्षीय बैठक घेणार आहोत. तसेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जसा वेळ मिळेल तसे बैठक घेऊन चर्चा करू. या संदर्भात ठोस पाऊल उचलत टिकणारे आणि समाजाचे समाधान होईल असेच आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे कुठेही समाजात दरी निर्माण होता कामा नये ही देखील सरकारची भूमिका आहे”, असे गिरीश महाजन म्हणाले. तसेच महाजन यांनी यावेळी बोलतांना ”दोन्ही समाजातील नेत्यांनी दरी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होता काम नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. हे माझे सर्वांना सांगणे आहे. तसेच आमच्या राजकीय नेत्यांनी एकमताने तोडगा काढला पाहिजे. निव्वळ राजकीय पोळी भाजण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. मतांसाठी हे दुभाजन कोणीही करू नये”, असे आवाहन देखील गिरीश महाजन यांनी केले आहे.