जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२५
शहरातील प्रमुख आकाशवाणी चौकातील व इच्छा देवी सर्कल अजिंठा चौफुली सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे व जंगली झाडे उगवून परिसर अतिशय विद्रूप व अस्वच्छ बनला आहे. या ठिकाणाची दुरवस्था लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहर तर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांना निवेदन देऊन तातडीने साफसफाईची मागणी करण्यात आली आहे.
मनसेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की “आकाशवाणी चौक हा शहरातील प्रमुख व गर्दीचा चौक आहे. या मार्गावरून जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी, उद्योजक व नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा महत्त्वाच्या चौकाचे विद्रूप दृश्य शहराच्या सौंदर्याला डाग लावणारे आहे.”
तसेच, मनसेने पुढील तीन दिवसांत सर्कल परिसर स्वच्छ न झाल्यास प्रतीकात्मक निषेध म्हणून त्या ठिकाणी बकऱ्या चारण्यात येतील, असा इशाराही दिला आहे. मनसेच्या या इशाऱ्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने साफसफाईचे काम करावे, अशी नागरिकांचीही अपेक्षा आहे. दरम्यान महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी यांनी याबाबत सविस्तर माहिती अशी दिली की सदर महामार्ग हा शहराच्या बाहेरून गेला असल्यामुळे सर्कल मधील साफसफाई ची जबाबदारी ही महापालिकेची आहे. या संदर्भात सविस्तर पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, ॲड सागर शिंपी, विकास पाथरे, विभाग अध्यक्ष दीपक राठोड हे उपस्थित होते.

 
			

















