जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२६
शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील मनुदेवी हाँ सोसायटी परिसरात गेल्या तीन दशकांपासून खुल्या भूखंडात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने संतप्त नागरिकांनी आज उपमहापौर मनोज चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून जून महिन्यात पावसाळा सुरू होताच सोसायटी शेजारील खुला भूखंड पूर्णपणे पाण्याने भरतो. पाणी दीर्घकाळ साचून राहत असल्याने डेंगू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, याच प्रभागाचे प्रतिनिधित्व उपमहापौर मनोज चौधरी यांनी अनेक वर्षांपासून केले असतानाही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. “दरवर्षी पावसाळा आला की हीच समस्या उभी राहते. तक्रारी करूनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढला गेला नाही,” असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
निवेदनात पुढे सुचविण्यात आले आहे की, संबंधित खुल्या भूखंडात माती, मुरूम, दगड, विटा आदी कच्चे साहित्य टाकून योग्य उतार तयार करावा, जेणेकरून पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाईल आणि साचणार नाही. पावसाळ्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना केल्यास आरोग्याचा धोका टाळता येईल, असा दावा नागरिकांनी केला आहे. मनुदेवी रुद्र प्रतिष्ठानतर्फे हे निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष पाहणी करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, उपमहापौर मनोज चौधरी यांनी नागरिकांच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून संबंधित विभागाला सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यावेळी तरी प्रशासन ठोस पावले उचलते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उपमहापौर चौधरींनी केले अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व !
उपमहापौर मनोज चौधरी यांचा हा प्रभाग असून त्यांनी अनेक वर्षापासून याच प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र आजवर जर हि समस्या सुटलेली नसल्याने आता मनोज चौधरी यांना उपमहापौर पदाची संधी मिळाल्यानंतर तरी हि समस्या सुटणार असा नागरिकांना आत्मविश्वास आहे.
निवेदनावर तब्बल ५६ नागरिकांच्या स्वाक्षरी !
मनुदेवी सोसायटी परिसरातील पितांबर कोळी, पवन शिरसाळे यांनी दिलेल्या निवेदनावर परिसरातील तब्बल ५६ नागरिकांच्या स्वाक्षरी असून या परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला असल्याचेही बोलले जात आहे.




















