जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२६
शहरातील नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने महापौर दीपमाला काळे यांनी एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले असून मनपा प्रशासनाने त्यानुसार नियोजनाला सुरुवात केली आहे. मात्र, एक दिवसाआड पाणी देताना पुरवठ्याचा कालावधी कमी करून केवळ ४५ मिनिटे ठेवावा लागेल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या जळगाव शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून दरवेळी दीड ते दोन तास पाणी सोडले जाते. नवीन नियोजनानुसार जर एक दिवसाआड पाणी द्यायचे ठरवले, तर वेळेत कपात अपरिहार्य ठरणार आहे. त्यानुसार दीड-दोन तासांऐवजी फक्त ४५ मिनिटे पाणीपुरवठा सुरू ठेवता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी मनुष्यबळ, तांत्रिक नियोजन आणि वितरण व्यवस्थेत बदल करावे लागणार असून प्रशासनास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तरीही महापौरांच्या निर्देशानुसार मनपा आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला तातडीने नियोजन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शहरात सध्या सुमारे ८५ हजारांहून अधिक नळजोडण्या आहेत. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाघूर धरणातून दररोज सुमारे ९० एमएलडी पाण्याची उचल केली जाते. त्यावर प्रक्रिया करून अंदाजे ७५ एमएलडी पाणी शहरात वितरित केले जाते. सध्या धरणात ८६ टक्के जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाष्पीभवनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात कधीपासून लागू होणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. कमी वेळेत पाणी भरण्याचे नियोजन कसे करावे लागणार, याबाबत नागरिकांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे.




















