मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अबूजर रफिक शेख (वय १९) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचे वडील रफिक शेख यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अबूजर हा आपल्या वडिलांना मिस्त्री कामात मदत करत होता. संशयितासोबत अबूजरची पूर्वीपासून ओळख होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास फोन वरून आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती दिल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता अबूजर गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले.
तक्रारीनुसार, जुन्या बांधकामाच्या ठिकाणी अबूजर आणि संशयित यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. त्यानंतर अबूजरवर लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर संशयित घटनास्थळावरून निघून गेला. काही वेळाने तो पुन्हा घटनास्थळी आला आणि चाकूने अबूजरच्या छातीवर वार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात अबूजर गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर अबूजरला तातडीने उपचारासाठी मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले. या घटनेनंतर बेलसवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्याचे नेमके कारण, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. तक्रारीच्या आधारे संबंधित संशयिताविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.




















