जळगाव मिरर | २० जून २०२५
व्यवसायासाठी थोडेथोडे करून घेतलेले ४ किलो सोने परत देण्यासाठी टाळाटाळ करीत सुनील दिनानाथ सराफ (वय ५५, रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ) यांची ३ कोटी रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना सन २००८ ते २०१४ दरम्यान घडली. या प्रकरणी सराफ यांचे शालक अमित दिलीप सोनार (वय ४५, रा. सिंधी कॉलनी, नंदुरबार) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुवर्ण व्यावसायिक असलेले सुनील सराफ यांचे जळगावातील सराफ बाजार परिसरात दागिने विक्रीचे दुकान आहे. नंदुरबार येथे राहणारे त्यांचे शालक अमित सोनार यांनी त्यांचा विश्वास संपादीत करीत त्याच्या नंदुरबार येथील दुकानावर दागिने बनविण्यासाठी थोडे-थोडे सोने घेत होते. सन २००८ ते २०१४ या सहा वर्षामध्ये ६० ग्रॅम ते २५० ग्रॅम प्रमाणे थोडे-थोडे करीत चार किलो सोने ते मेव्हण्याकडून घेवून गेले होते. त्यातून दागदागिने बनवून ते व्यवसायासाठी वापरले आहे. तसेच सराफ यांना पैसे अथवा सोने देण्याविषयी टाळाटाळ करीत ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने घेऊनही ते परत देत नसल्याने सुनील सराफ यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमित सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.
सहा वर्ष होऊनही शालकाला दिलेले सोने सुनिल सराफ यांनी परत मागितले. व्यावसायाकरीता दिलेले सोने परत मिळत नसल्याने सराफ हे वेळोवेळी ते मागण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यासह दमदाटी करण्यात यायची, असे सराफ यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
