जळगाव मिरर | २० जुलै २०२५
राहत्या घरात शुभांगी कुणाल नाईक (वय २५, रा. आदित्य चौक, मेहरुण) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास मेहरुण परिसरात घडली. विवाहितेने आत्महत्या केली नसून तीला सासरच्या मंडळींनी गळफास देऊन मारल्याचा आरोप माहेरच्यांनी केला होता. जोपर्यंत सासरचे मंडळी येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका माहेरच्यांची घेतली होती.
शहरातील आदित्य चौक परिसरात शुभांगी नाईक या विवाहिता वास्तव्यास आहे. या विवाहितेने शनिवारी दुपारच्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना उघडकीस आल्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच विवाहितेची आई, वडील, भाऊ व अन्य नातेवाईक रुग्णालयात पोहचले. या ठिकाणी ते आक्रमक झाले व सासरच्या मंडळींवर प्रचंड रोष व्यक्त केला. या घटनेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच माहेरच्या मंडळींची गर्दी जमली होती.
विवाहितेचे वडील राजेंद्र भागवत वाघ (रा. पिंपळा, ता. सोयगाव) यांनी मुलीचे सहा वर्षापुर्वी लग्न झाल्यापासून तिला सासरचे मंडळींकडून त्रास देवून तिचा छह केला जात होता. तसेच माहेरच्या मंडळींशी देखील ते बोलू देत नव्हते व येऊ देखील देत नव्हते असा आरोप त्यांनी केला. आमच्या मुलीला आम्ही जीवंत पाठविले होते, ती आम्हाला परत मिळाली पाहिजे, असे म्हणत विवाहितेच्या आईने प्रचंड आक्रोश केला. मध्यंतरी सासरच्या मंडळींनी शुभांगीला माहेरी आणून सोडले. त्यानंतर चारच दिवसात तिला घेऊन गेले. तिला होणाऱ्या त्रासामुळे तिला पाठवित नव्हतो, मात्र काही जणांनी मध्यस्थी केली. त्यानंतर पाच वर्षाच्या मुलासाठी मुलीला पाठविल्याचे विवाहितेच्या वडिलांनी सांगितले. आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, असे सांगत सासरच्यांनीच तिला मारल्याचा आरोप त्यांनी केला.
