
जळगाव मिरर | १५ जून २०२४
राज्यातील अनेक शहरात भीषण अपघाताची घटना सातत्याने समोर येत असतांना नुकतेच कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसखाली सापडून दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेमध्ये दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत आता शाहूपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याची सुद्धा शक्यता आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे ओळख पटवण्याचे काम सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे.
मृत्यू झालेल्या महिलेमधील एक महिला 40 ते 45 तर दुसरी 25 ते 30 वयोगटातील आहे. दोघींचाही चेहरा छिन्नविच्छिन्न झाला आहे. त्यांच्यासोबत असणारी लहान मुलगी 10 ते 12 वर्षांची असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. रुळावर धडक बसताच लोको पायलटने रेल्वेचा वेग कमी करत काही अंतरावर नेऊन थांबवली. रेल्वे अचानक थांबल्याने परिसरातील नागरिकही रुळाच्या दिशेने आले. यावेळी या तिघींचेही मृतदेह आढळून आले. लोको पायलटने ही माहिती रेल्वेगार्डला दिली. त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अजय सिंदकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
एका अफवेमुळे चार प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. त्यामुळे चौघेही दुसऱ्या ट्रॅकवर आलेल्या मालगाडी खाली चिरडले गेल्याने मृत्यूमुखी पडले. धनबाद मंडलमधील कुमंडीह स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली. रांची सासाराम इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली होती. चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून एक लहान मुलगा जखमी झाला आहे. रांची सासाराम एक्सप्रेस निर्धारित वेळेत धावत होती. लातेहार स्टेझन गेल्यानंतर अफवा पसरली की ट्रेनमध्ये आग लागली आहे. तेव्हा ट्रेन कुमंडीह रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती. आग लागल्याची अफवा पसरताच ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. ट्रेनच्या दरवाजात उभा असलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उडी मारली. यावेळी प्रवासी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मालगाडीखाली चिरडले गेले.





















