
जळगाव मिरर । २५ एप्रिल २०२६
वरणगाव हायवेवरील महारुद्र हॉटेलसमोर गुरुवारी दि. २३ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी भरधाव वाहन चालवून अपघात घडवून आणत घटनास्थळावरून पसार झालेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी पूनमचंद कालीदीन परदेशी (वय ४९) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ संदीप कालीदीन परदेशी (वय ३६) गुरुवारी रात्री मोटारसायकल (क्र. एमएच १९ ईएच ९८३६) वरून मुक्ताईनगरकडून भुसावळकडे जात होते. त्यांच्यासोबत त्यांच्या आई तुलसाबाई कालीदीन परदेशी या देखील होत्या. दरम्यान, वरणगाव हायवेवरील महारुद्र हॉटेलसमोर आल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ०५ डीके ०२९४ या क्रमांकाच्या वाहनाने वेगावर नियंत्रण न ठेवता दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की संदीप परदेशी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या आई तुलसाबाई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर संबंधित वाहन चालक राकेश दशरथ भंगाळे (रा. वझरखेडा, ता. भुसावळ, जि. जळगाव) हा घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणे तसेच अपघात करून पळ काढणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बैंडकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





















