
जळगाव मिरर | ७ जून २०२४
राज्यात लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या ‘शकुनी नीती’द्वारे महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे राज्यात भाजपला पराभव पत्करावा लागला, मात्र या निवडणुकीतील निकालाचा राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. भाजप आपल्या विकासाच्या अजेंड्यावर विजयी होईल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केला. नागपूर विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील निकालासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘राज्यघटना धोक्यात आहे आणि भाजप ती बदलणार आहे,’ असे सांगून समाजाची दिशाभूल केली. आदिवासींचे हक्क भाजप हिरावून घेणार आहे, अशा पद्धतीचे खोटे ‘नॅरेटिव्ह’ पसरवण्यात आले. तसेच भाजप आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगून मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आली. जातीवादी आणि गोंधळाचे राजकारण जिंकले आणि भाजपने सुरू केलेल्या विकासाच्या राजकारणाला किरकोळ पराभवाला सामोरे जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने विकसित भारतासाठी मते मागितली. मात्र ‘इंडिया’ आघाडीने जातीवादी राजकारणाच्या दिशेने काम केले, जे फारसे टिकणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासंदर्भातील घोषणेविषयी विचारले असता, भाजपच्या मुख्य गटाचे नेते, सर्व खासदार, आमदार, नेते व कार्यकर्त्यांनीही देवेंद्र फडणवीस प्रदेश नेतेपदी कायम राहावे, अशी विनंती केली असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. दिल्लीत होणाऱ्या संसदीय मंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी राज्याचे खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.
महाराष्ट्रात भाजप व महायुतीच्या जागा कमी होण्यात महायुतीचा जागावाटपाचा निर्णय एक कारण आहे का, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, भाजपने जागा का गमावल्या, याचे आत्मपरीक्षण केले जाणार आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील त्यांनी गमावलेल्या जागांबाबत आत्मपरीक्षण करतील. आम्ही कारणांचे परीक्षण करू आणि कारणे दुरुस्त करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.





















