
जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२५
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहे. दमानिया यांनी गडकरींवर टोलच्या माध्यमातून जनतेची लूट केल्याचा थेट आरोप केला आहे. लोक आधीच रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी असे विविध कर भरत असताना अतिरिक्त टोल आकारण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
याचबरोबर टोलमधून जमा झालेला पैसा ‘आयडीएल’ नावाच्या खासगी कंपनीकडे वळवून त्यानंतर गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला असल्याचा धक्कादायक खुलासा दमानिया यांनी केला. रस्ते जनतेसाठी बांधले जातात, पण त्याचा पैसा खासगी फायद्यासाठी वळवला जातो, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी थेट गडकरींच्या राजकीय स्वच्छतेवर बोट ठेवले आहे.
अंजली दमानिया यांनी सरकारच्या बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) आणि टोल-ऑपरेट-ट्रान्सफर (TOT) या मॉडेलवरही जोरदार टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या मॉडेलमधून प्रत्यक्षात रस्त्यांचे काम तर होत असते, पण त्यामागे प्रत्येक किलोमीटरमागे भ्रष्टाचार लपलेला आहे. दमानिया म्हणाल्या की, ज्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते, तेच गडकरी प्रत्येक रस्त्याच्या किलोमीटरमागे आणि टोलमधून पैसे खात असल्याचा संशय आहे. त्यांनी गडकरींवर इथेनॉल क्षेत्राशी संबंधित घोटाळ्याचे आरोपही केले असून गडकरींशी संलग्न असलेल्या अनेक कंपन्या या व्यवहारांत सक्रिय असल्याचा दावा केला. दमानिया यांच्या मते, या सगळ्या प्रकरणामध्ये गडकरींच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
या सर्व प्रकरणात अंजली दमानिया यांनी 128 कंपन्यांचा उल्लेख केला आहे. माझ्याकडे या सर्व कंपन्यांची माहिती आहे आणि जर ही संपूर्ण माहिती उघड केली तर वर्षभर पुरेल इतका भ्रष्टाचार यातून बाहेर येईल, असे दमानिया म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक कंत्राटामध्ये गडकरींशी संबंधित कंपन्या थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होतात, ही बाब गंभीर आहे. दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे टोल व इथेनॉल उद्योगातील पारदर्शकतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनतेच्या पैशावर उभारलेले प्रकल्प जर खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी वळवले जात असतील, तर हा स्पष्ट घोटाळा आहे, असे मतही त्यांनी मांडले.





















