जळगाव मिरर । २९ ऑक्टोबर २०२५
राज्यातील येवला तालुक्यात साईभक्तांच्या फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला असून तीन जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरतवरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना एरंडगाव रायते शिवार परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दोन ते तीन पलट्या मारल्या. अपघातानंतर घटनास्थळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र त्यापैकी एकाने रस्त्यातच प्राण सोडला. उर्वरित चार जखमींवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की फॉर्च्युनर गाडीचे पुढील व मागील दोन्ही भाग पूर्णपणे चकनाचूर झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले, तर पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. उपचारासाठी नाशिकला नेत असताना एका जखमीने मार्गातच प्राण सोडले. त्यामुळे मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. उर्वरित चार जण नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यात आली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
या अपघाताचा पंचनामा करताना पोलिसांनी सांगितले की, वाहन अतिवेगाने चालवले जात होते, त्यामुळे नियंत्रण सुटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अपघातस्थळाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मागवून तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी वाहनाची तांत्रिक तपासणीही केली जाणार आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे त्या रस्त्यावरील धोकादायक वळणांवर चेतावणी फलक आणि स्पीडब्रेकर्स बसवण्याची मागणी केली आहे.

 
			

















