
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६
मुक्ताईनगर शहरातील गोदावरीनगर परिसरातील पालिकेच्या उद्यानात खेळणाऱ्या लहान मुलांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत सहा बालके व त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या दोघांसह एकूण आठ जण जखमी झाले. त्यापैकी तीन मुलांची प्रकृती काहीशी गंभीर असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरीनगरातील अनिल महाजन यांच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम २६ एप्रिल रोजी पार पडला. यानिमित्त रावेर तालुक्यातील निंबोल, कुंभारखेडा येथून नातेवाईक व वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने महाजन यांच्याकडे आली होती. कार्यक्रमानंतर सायंकाळच्या सुमारास मुले घराजवळील उद्यानात खेळण्यासाठी गेली होती. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उद्यानातील मधमाश्यांचे पोळ अचानक उठले. मधमाश्यांनी खेळत असलेल्या मुलांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुले आरडाओरड करत सैरावैरा पळू लागली. हा प्रकार लक्षात येताच अनिल महाजन व मयूर पाटील यांनी तत्काळ धाव घेत मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तेही मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुमारे अर्धा तासानंतर मधमाश्या पांगल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, शिवा पाटील यांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना तातडीने खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे ऋत्वा हर्षल पाटील, दुर्वांश मयूर पाटील आणि आराध्य सुनील पाटील या तीन बालकांना उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेत ऋत्वा हर्षल पाटील, दुर्वाश मयूर पाटील, आराध्य सुनील पाटील, विश्वा मयूर पाटील, यश प्रल्हाद महाजन, अंशिका नितीन पाटील ही ९ ते १० वयोगटातील बालके तसेच अनिल महाजन व मयूर पाटील हे जखमी झाले





















