
जळगाव मिरर | १० जून २०२४
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यानंतर नियंत्रण हुकलेली बस थेट दरीत कोसळली. या भ्याड हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. मृतांमध्ये उत्तर प्रदेशच्या भाविकांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत बचाव कार्याबाबत उपराज्यपाल व पोलीस महासंचालकांसोबत चर्चा केली. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांची हयगय करणार नसल्याचा इशाराही शाह यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या हल्ल्याच्या निषेध केला. शिव खेरी येथील मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ५३ जणांसह ही बस कटरा येथील वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जात होती. रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तरेयाथ गावाजवळ येताच या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला सुटल्याने अनियंत्रित झालेली बस खोल दरीत कोसळली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी व सुरक्षा दलाच्या जवानांनी बचाव अभियान राबवत जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले आहे. दहशतवाद्यांनी बसवर २५ ते ३० गोळ्या झाडल्यानंतर बस दरीत कोसळल्याचा दावा या अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीने केला आहे.
चेहऱ्याला कापड बांधून आलेल्या व गळ्यात लाल रंगाची मफलर असलेल्या एका हल्लेखोराने बसवर गोळीबार केल्याचेही एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने दिली. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने शिव खोरी मंदिराची सुरक्षा वाढवली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस, सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने या भागात दहशतवादविरोधी अभियान सुरू केले आहे. बसवर गोळीबार करणारे दहशतवादी राजौरी, पूंछ व रियासीच्या पर्वतीय क्षेत्रात दडून बसल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून हल्लेखोरांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जुलै २०१७ मध्ये काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ७ भाविक ठार, तर १९ जण जखमी झाले होते.





















