जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२६
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आपल्यासमोरच झाली होती, असा दावा करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा थंड बस्त्यात गेल्याचे बोलले जात असतानाच सयाजी शिंदे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
सयाजी शिंदे यांनी रविवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “अजित पवारांनी सर्वधर्म समभाव जपत, गरीब-श्रीमंत असा भेद न करता काम करण्याचा निर्धार केला होता. दोन्ही गट एकत्र येणे हे दादांचे पहिले स्वप्न होते. ते स्वप्न अपूर्ण राहिले असून, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी—विशेषतः सुनेत्रा वहिनी, सुप्रिया ताई आणि पवार कुटुंबाने—घ्यायला हवी.”
महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबांनी तात्काळ एकत्र आले पाहिजे, असे मत व्यक्त करताना त्यांनी काही कौटुंबिक अहंकार किंवा भावना असतील तर त्या बाजूला ठेवण्याचे आवाहन केले.
सयाजी शिंदे यांनी पुढे दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा प्रत्यक्ष आपल्यासमोर झाली होती. “आमच्यासमोर स्पष्ट बोलणे झाले होते की, आता सर्व काही एकत्रपणे सुरू होईल. पण अचानक घडलेल्या घटनांमुळे या चर्चेला वेगळे वळण देऊ नये. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केले तरच महाराष्ट्राचा विकास होईल,” असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील विलीनीकरणाची चर्चा थंडावल्याचे चित्र आहे. शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवार विलीनीकरणासाठी आग्रही होते, असा दावा केला असला तरी सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह इतर नेत्यांनी अशा कोणत्याही चर्चेला दुजोरा दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर, सयाजी शिंदे यांच्या “चर्चा माझ्यापुढेच झाली होती” या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





















