समाजातील सर्वच क्षेत्रांतील घटकांनी महाशोभायात्रेत सहभागाचे मान्यवरांचे आवाहन
जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२६
आपला परमपवित्र भारत देश कृषीप्रधान आहे. गेली कित्येक वर्षे आपण सुजलाम्- सुफलाम् स्थितीची अनुभूती घेतली आहे. मात्र, काही वर्षांपासून किंबहुना सद्यःस्थितीत देशातील शेती, शेतकरी, शेतमजूर व कृषी उत्पन्न आदींची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. आपल्या पूर्वजांनी पिढ्यान् पिढ्या सेंद्रीय व सकस शेती केल्याने ते कायम सुदृढ होते. त्यामुळे देशातील कृषी क्षेत्रास पुनर्वैैभव व निरामयता प्राप्त करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांनी भूमी सुपोषण चळवळ जनजागरासाठी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. त्या अनुषंगाने बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात काढण्यात येणाऱ्या महाशोभायात्रेत समाजातील सर्वच क्षेत्रांतील घटक व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विविध मान्यवरांनी केले.
येथील श्री मंगळग्रह मंदिरात ‘माझा संकल्प-भूमी सुपोषण’ चळवळ जनजागरण महाशोभायात्रेच्या आयोजन-नियोजनासंदर्भात रविवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. त्यात महाशोभायात्रेतील सहभाग, मार्ग, जनजागृतीपर घोषवाक्य आदींबाबत चर्चा करण्यात आली. आमदार अनिलदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबरावदादा पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडे, जितेंद्र जैन, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, ओम शांती परिवाराच्या विद्यादीदी व आरतीदीदी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर होते. बैठकीस आजी-माजी नगरसेवक, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, महिला बचत गट, अनेक गावांतील सरपंच-उपसरपंचांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी भूमी सुपोषण चळवळ काय आहे? याविषयीची सविस्तर माहिती दिली. 18 फेब्रुवारी रोजी निघणाऱ्या महाशोभायात्रेचे स्वरूप सांगितले. तसेच 19 मार्च 2026 रोजी वर्षप्रतिपदा आहे. हा दिवस भूमी मातेचा जन्मदिवस असतो. आपल्या श्री मंगळग्रह मंदिरात भूमी माता व भूमिपुत्र श्री मंगळग्रह देवता यांच्या मूर्ती असल्याने देशव्यापी चळवळीचा प्रारंभ अमळनेर येथून होत आहे. शेतकऱ्यांनी मोठा सहभाग नोफ्लदवून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा ः खासदार स्मिताताई वाघ
अती उत्पन्न घेण्याच्या नादात जमिनीचा कस जात आहे. पेस्टिसाइड्स, रासायनिक खतांमुळे सकस आहार मिळत नाही. युरियापासून दूध बनविले जात आहे. आपण खाणार काय? महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे. त्यामुळे आपल्यालाच आता चांगली सुरूवात करायची आहे. अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरातून जागतिक स्तरावरील संस्थेच्या भूमी सुपोषण चळवळ जनजागराची सुरूवात होते, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वच घटकांनी महाशोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मात्र, पुढचा टप्पाही खूप महत्त्वाचा आहे. याचे सूक्ष्म नियोजन आपल्याला सर्वांना करावयाचे आहे. 19 मार्च 2026 रोजी होणाऱ्या भूमी सुपोषण कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
अमळनेरचे नाव देशपातळीवर पोहोचावे ः आमदार अनिलदादा पाटील
भूमी सुपोषण जनजागर चळवळीची सुरूवात श्री मंगळग्रह मंदिरातून होत आहे, याचा अभिमान आणि अत्यानंद आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. महाशोभायात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोफ्लदवावा. सरपंच, विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण भागाचा कणा आहे. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जाईल. यासाठी आपल्या पक्ष कार्यालयातून ग्रामीण भागातील संस्थांशी आमचे कार्यकर्ते संपर्क साधतील. शेतकऱ्यांशीही संवाद साधतील. भूमी सुपोषण जनजागरण चळवळीच्या या देशव्यापी कार्यक्रमासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अमळनेरच नाही तर धुळे व जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सहभागासाठी विशेष नियोजन केले जाईल. भूमी सुपोषण ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. हा कार्यक्रम यशस्वी करून अमळनेरचे नाव देशपातळीवर पोहोचवावे.
कार्यक्रम अभूतपूर्व करावा ः माजी आमदार कृषिभूषण साहेबरावदादा पाटील
मातीचे सुपोषण नसल्याने आपण कुपोषित होत चाललो आहोत. आपल्याला जे काही मिळते ते भूमी मातेतूनच अर्थात शेतीतून मिळते. चांगले जे येते ते मातीतूनच येते. भूमीला मातेचा दर्जा देण्यात यावा. मंगळग्रह सेवा संस्थेने भूमी सुपोषण जनजागर चळवळीचे विधायक कार्य हाती घेतले आहे. यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. भूमीची सेवा करण्याची मला संधी मिळते, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी भूमी सुपोषण जनजागर चळवळीसाठी केलेले सूक्ष्म नियोजन कौतुकास्पद आहे. 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशोभायात्रेत सर्वच घटकांनी सहभागी होऊन जनजागृती करावी. तसेच 19 मार्चचा कार्यक्रम अभूतपूर्व करावा.
स्मृती (स्व.) अजितदादांच्या..!
श्री मंगळग्र्रह मंदिराला केवळ (स्व.) अजितदादांच्या सांगण्यावरूनच 15 एकर जागा मिळाली आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अजितदादांच्या उपकारांची जाणीव असल्याने मंदिर परिसरात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काहीतरी करण्याची योजना तयार आहे.





















