
जळगाव मिरर | २ मे २०२५
देशातील विरोधकांनी पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला लक्ष करत पाकिस्तानवर हल्ला करायच्या सूचना देत असतांना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट पाकीस्तानला दम भरला आहे. काही लोकांना वाटत असेल की, आम्ही हल्ला केला आहे, पण भारत तर गप्प आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, हे मोदींचे सरकार आहे आणि दहशतवाद्यांना येथे थारा नाही. एका एकाला पकडून त्यांचा खात्मा केला जाईल, असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांसह त्यांच्या मास्टरमाईंडांना दिला आहे. बोडो नेते उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या सन्मानार्थ बांधलेल्या रस्त्याच्या आणि पुतळ्याच्या उद्घाटन समारंभात अमित शाह बोलत होते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात दहशतवादाविरुद्ध विशेष मोहीम आखली जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. हे क्रूर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधात भारतीय सुरक्षा दलाचे पथक जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन राबवत आहे. भारत सरकारने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाईचे ठिकाण, वेळ आणि पद्धत सैन्य ठरवेल, असे पंतप्रधान मोदींनी देखील बैठकीत स्पष्ट सांगितले. दरम्यान, गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला.
अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ईशान्येकडील प्रदेश असो की, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी क्षेत्र असोत किंवा काश्मीरमधील दहशतवादाचे सावट असोत, प्रत्येक गोष्टीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर कोणाला वाटत असेल की त्याने भ्याड हल्ला करून मोठा विजय मिळवला आहे, तर समजून घ्या की हे नरेंद्र मोदी सरकार आहे, कोणालाही सोडले जाणार नाही.
या देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईल. या लढाईत केवळ 140 कोटी भारतीयच नाही तर संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे, जगातील सर्व देश एकत्र आले आहेत आणि दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतीय जनतेसोबत उभे आहेत. अमित शहा पुढे म्हणाले की, मी हा संकल्प पुन्हा सांगू इच्छितो की, जोपर्यंत दहशतवादाचा नायनाट होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील आणि ज्यांनी तो केला आहे त्यांना निश्चितच योग्य शिक्षा मिळेल. असं देखील म्हणाले.





















