जळगाव मिरर विशेष
सन २०१९ मध्ये जगभर कोरोनाचा हाहाकार सुरु झाला त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या जे तरुण परगावी गेले होते ते देखील जळगाव जिल्ह्यात पुन्हा आले व मिळेल ते काम करू लागले पण कोरोना हा भयंकर आजार आल्यापासून जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने अनेकांना हद्दपार केले आहे तर काहीना जेरबंद देखील केले आहे. पण जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी का वाढतेय, यावर अद्याप कुणीही बोलायला तयार नाही, जळगावातील तरुण गुन्हेगार का होतोय ? हा प्रश्न आज देखील अनुत्तरीत राहिलेला आहे.
जळगावातील तरुण निघाले परगावी
जळगाव जिल्ह्यात अनेक तरुण व तरुणींनी उच्च शिक्षण घेतले आहे पण जळगाव जिल्ह्यात कुठलीही मोठी संधी मिळत नसल्याने अनेक तरुण तरुणी मुंबई, नाशिक, पुणेसारख्या मोठ्या शहरात जावून नोकरी करून परिवार चालविण्याची धडपड करीत आहे. मात्र ज्या तरुणाचे शिक्षण झाले आहे पण त्यांना बाहेरगावी जाण्यापासून परिवाराचा विरोध आहे त्यांना आज देखील जळगाव शहरात १० ते १५ हजार रुपये महिना कमवून परिवाराचा कसा बसा उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्याच तरुणाना पुणे, मुंबई सारख्या शहरात ३० ते ४० हजार पगार मिळत आहे पण मात्र जळगावात तो तरुण १० हजारात पोट भरण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे अनेक तरुण परगावी जाणे पसंद करीत आहे.
जळगावात काम करून देखील पगार मिळेना
जळगाव शहरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कंपनी आहे, त्यातील अनेक कंपनीमध्ये कामगार व मजुराचे मोठ्या प्रमाणात काम आहे पण उच्च शिक्षित तरुण देखील हे काम सध्या करू लागला आहे. जिल्ह्यात अनेक कंपन्यामध्ये तब्बल दोन ते तीन महिने उशिरा पगार मिळत आहे, तरी देखील तरुणाला काम करावे लागत आहे जर काम सोडले तर जो आहे तो पगारसुद्धा मिळणार नाही, अशी आशा घेवून तरुण कंपनीत काम करीत आहे. पण एक दिवस या तरुणाचा जर उद्रेक झाला तर भविष्यात या कंपन्याना एकही कर्मचारी मिळणार नाही असा दिवस देखील दूर नाही.
बेरोजगारीतून गुन्हेगारीकडे
उच्च शिक्षित तरुण परगावी जावू लागले आहे तर ज्यांचे शिक्षण थोड्या फार प्रमाणात झाले आहे ते तीन महिने उशिरा का होईन त्या कंपनीत काम करू लागत आहे, मात्र काही तरुण अवैध उद्योगाकडे वळत आहे. त्यामुळे पैश्यासाठी होणारे वाद व वादातून होणाऱ्या खुनाच्या अनेक घटना जळगाव जिल्ह्यात घडल्या नाही असे नाही. अगदी कमी वयात या तरुणांच्या हातून गुन्हेगारी घडत आहे. पोलीस स्थानकात ढीगभर गुन्हे दाखल होत आहे. एकदा गुन्हेगारीच्या विळख्यात तरुण अडकला कि तो कोणता सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करेल तो पक्की गुन्हेगारीच करू लागतो. हे मात्र खरेच.
…तर गुन्हेगारी मुक्त जिल्हा होणार
जळगाव जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी उपाययोजना देखील करणे महत्वाचे आहे. जर तरुणांना बेरोजगारीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या संकटातून जर जळगाव जिल्ह्यतील राजकीय मंडळींनी त्या तरुणांना बाहेर काढल्यास व जिल्ह्यात अनेक छोटे मोठे उद्योग आणल्यास जिल्ह्यातील तरुणांना नोकरी मिळू लागेल व जळगाव जिल्हा देखील गुन्हेगारी मुक्त होवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच राजकीय मंडळींनी रस्ते, पाणी, गटार, याशिवाय बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी निर्माण करावी हीच अपेक्षा.