
जळगाव मिरर | २६ मे २०२५
गेल्या काही दिवसापासून पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असतांना आता अमरावती शहरातील एका 30 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पतीच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. तर जावयानेच आपल्या मुलीची हत्या केली असल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीन्सुअर, अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात एका 30 वर्षांच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शुभांगी निलेश तायवाडे असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. बँकेत कामाला असलेल्या पतीच्या छळाला कंटाळून शुभांगीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. शुभांगीचा पती निलेश तायवाडे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सीनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे, तर शुभांगी आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करत होती. शुभांगी आणि निलेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना तीन वर्षांची आणि एक वर्षांची अशा दोन मुली आहेत.
लग्नानंतर काही कालावधीतच निलेशने शुभांगीवर मानसिक आणि भावनिक छळ सुरू केला होता, असा आरोप शुभांगीच्या आई-वडिलांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, या सततच्या त्रासामुळेच शुभांगीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात तिच्या मृत्यूमागे होणाऱ्या छळाला कारणीभूत धरत तिच्या कुटुंबीयांनी निलेशविरोधात गंभीर आरोप केले आहेत.
शुभांगीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र, तिचा लहान भाऊ पोहोचेपर्यंत शवविच्छेदन करू नये, अशी मागणी शुभांगीच्या कुटुंबीयांनी केली आहे. शुभांगीने आत्महत्या केली नसून, तिचा पती निलेश तायवाडे यानेच तिला फासावर लटकवून ठार केल्याचा गंभीर आरोप शुभांगीच्या आईने केला आहे. या प्रकरणामुळे कुटुंबात शोककळा पसरली असून, निलेशवर हत्या केल्याचा संशय बळावत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
आठ दिवसांपूर्वीच आपल्या मुलीला मारहाण करण्यात आली होती, असे मृत शुभांगीच्या वडिलांनी सांगितले. “तुमची मुलगी घेऊन जा, मला घटस्फोट पाहिजे,” असे शब्द जावयाने वापरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शुभांगी ही कम्युनिटी हेल्थ ऑफिसर होती, ती आत्महत्या करेल असा विश्वास बसत नाही, असा दावा तिच्या वडिलांनी केला. आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, तिचा पती निलेश तायवाडे यानेच तिला गळफास लावून ठार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या घटनेचा तपास सध्या गाडगे नगर पोलीस करत आहेत. शुभांगीचा पती निलेश तायवाडे आणि सासू यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, सत्य उजेडात येण्यासाठी पोलिसांकडून गंभीरतेने चौकशी केली जात आहे.





















