
जळगाव मिरर । २५ सप्टेंबर २०२५
शहरातील असोदा रेल्वेउड्डाण पुलाच्या खाली धावत्या रेल्वेखाली अनोळखी प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान मयत हे ज्ञानेश्वर सुदाम पाटील (वय ५५) हे असून ते वाल्मीक नगर मधील रहिवासी असल्याची ओळख बुधवारी सकाळच्या सुमारास पटली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाल्मिक नगरातील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर पाटील हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. रिक्षा आणि खाजगी कंपनीत काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान सोमवारी रात्री ते घरात कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांचा असोदा रेल्वे गेटजवळ मृतदेह आढळून आला होता. यावेळी शनिपेठ पोलिसांनी धाव घेऊन सुरुवातीला अनोळखी म्हणून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी ७वाजता मयत हे ज्ञानेश्वर पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली आणि ओळख पटवली. त्यानंतर आज शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.




















