जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२६
जळगाव ते चांदवड महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कार (एमएच-१७, बीएल-८८०८) ने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास पाचोरा–जळगाव महामार्गावरील हॉटेल पांडुरंग गार्डनजवळ कारचा भीषण अपघात झाला.
कार वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात आदळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात पिंप्राळा येथील प्रसन्न रवींद्र निमजे (वय २३) व श्रीरंग सुरेश पाटील (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात रोहित सोनार (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. तसेच निखिल कच्छवा (वय २५), अनिकेत कोळी (वय २२), नीलेश वाघ (वय २३) हेही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक बबलू मराठे, भागवत पाटील, गोलू पाटील व किशोर लोहार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




















