जळगाव मिरर / १७ मार्च २०२३ ।
राज्यात सध्या बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर काही भागात विजेच्या कडकडाटासह वादळ सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्यामध्ये शनिवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर आज विदर्भातील बहुतांश भागांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर आज १७ मार्च रोजी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी गारपीटीचा तडका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर या भागांमध्ये गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यामध्ये सध्या हरभरा, गहू, द्राक्ष, करडई इत्यादी रब्बी पिकांची काढणी सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. फळबागांना देखील गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. तर वादळी पावसामुळे भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.