
जळगाव मिरर | 21 एप्रिल 2026
चोपडा शहरातील तारामती नगर भागातील प्रदीप राजेंद्र माळी (वय ३२) या अविवाहित तरुणाची शहरातील तिरंगा चौकाजवळील हॉटेल रोहितपुढे दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याची घटना २० रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून तीन संशयितांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन एक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघा संशयितांच्या शोधासाठी पोलीस मुंबईला रवाना झाले आहेत.
या प्रकरणी संशयित चेतन कानडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून विजय वैदकर व निर्मल बडगुजर यांच्या शोधासाठी पोलिसांची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे. दरम्यान, मयत प्रदीप राजेंद्र माळी हे शहरातील तारामती नगरमध्ये राहत असून ते हमाली काम करायचे. दरम्यान, १९ रोजी ९ वाजेच्या सुमारापासून प्रदीप माळी हे बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या काळात ते विजय भास्कर वैदकर (भाग्योदय नगर, चोपडा), निर्मल संजय बडगुजर (चिंच चौक, चोपडा) यांच्यासोबत १९ रोजी ९.३० वाजेच्या सुमारास शहरातील तिरंगा चौककडे जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले आहेत. तर चेतन सुभाष कानडे (पाटील गढी, चोपडा) याने मयत प्रदीप यांची पानटपरी १३ मार्चला जाळली होती. त्या दोघामध्ये भांडण झाले होते. याच कारणावरून चेतन कानडे याला ही पोलिसांनी जळगाव जाताना ताब्यात घेतले आहे. तर विजय वैदकर व निर्मल बडगुजर या दोघांच्या शोधासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची टीम मुंबईला रवाना झाली आहे, अशी माहिती डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवाराने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. जोपर्यंत गुन्हेगारांना ताब्यात घेत नाही, तोपर्यंत आम्ही कुठलीही अंत्यविधी करणार नाही, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. तर शवविच्छेदनासाठी जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात मयत प्रदीप माळी यांचा मृतदेह रवाना करण्यात आला आहे.
घटनास्थळी चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट दिली. तर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक हितेंद्र देशमुख, डॉ. रोहन पाटील, बाबा देशमुख, आबा देशमुख, शरद पाटील यांच्यासह नातेवाईक, मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन देसले, ग्रामीणचे निरीक्षक महेश टाक, अडावदचे स.पो.नि. प्रमोद वाघ, शहरचे स.पो.नि. एकनाथ भिसे लक्ष ठेवून होते.
तरुणाची दगडाने ठेचून निघृण हत्या झाल्याची घटना पोलिसांना २० रोजी सकाळी ७.३० वाजता समजली. लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर तरुणाची ओळख पटेना. या वेळी मयताच्या अंगावरील कपडे, हातावरील टॅटू व खिशातील लग्नपत्रिका यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर मयत प्रदीप माळी याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांना घटना कळवली.
शहरातील चिंच चौकातील पोलिसांनी लावलेल्या सिसिटीव्ही फुटेजमध्ये मयत प्रदीप माळी, विजय वैदकर व निर्मल बडगुजर हे तिघे दुचाकीने जातांना १९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आढळले आहेत. त्यानंतर थाळनेर दरवाजा, स्वस्तिक टॉकीज, स्टेट बैंक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, पंचायत समिती येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत प्रदीप माळी व दोघे साथीदार दुचाकीवरून जाताना दिसले आहेत. यावरून पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आहेत. यात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची एक टीम मुंबईकडे रवाना झाली आहे.





















