
जळगाव मिरर | १९ मे २०२६
चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, माकडाच्या चाव्यामुळे अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनुश्री विशाल मराठे असे मृत बालिकेचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून वन विभागाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावात गेल्या काही दिवसांपासून माकडांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि जंगल परिसरात निर्माण झालेल्या पाण्याच्या टंचाईमुळे माकडे अन्न व पाण्याच्या शोधात ग्रामीण तसेच शहरी भागाकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खरजई गावातही काही माकडांनी अनेक दिवसांपासून ठाण मांडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
याचदरम्यान, माकडांच्या कळपातील एका माकडाने ३ वर्षीय अनुश्री विशाल मराठे या चिमुकलीला चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेत अनुश्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला. निष्पाप बालिकेच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, गावात माकडांचा वाढता वावर लक्षात घेता ग्रामपंचायतीने याबाबत वन विभागाला पूर्वसूचना दिली होती का? तसेच संबंधित यंत्रणेकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असे प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. वाढत्या उपद्रवाकडे वेळेत लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर खरजई गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुलांना घराबाहेर सोडण्यास पालक धास्तावले आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून माकडांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.





















