
जळगाव मिरर । २६ डिसेंबर २०२२
वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. तसेच परिसराची स्वच्छता न केल्यास रोगराई येऊ शकते. त्यामुळे शहरातील स्वच्छतेबरोबरच गावांमधील स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. याकरिता आरोग्य शिक्षणाची सांगड शालेय शिक्षणाशी घातल्यास आपले जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
भुसावळ येथील महाराणा प्रताप विद्यालयाचे एकदिवशीय समाजसेवा शिबिर तालुक्यातील गोजोरे येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडले. या शिबिराच्या समारोपाप्रसंगी डॉ. पाटील यांनी ‘स्वच्छता काळाची गरज’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वच्छता, धार्मिकता व शिक्षण या त्रिसूत्रीची सांगड घातली. यावेळी मुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षक नारायण घोडके, समाजसेवा शिबिर प्रमुख कैलास गायकवाड व योगेश जोशी तसेच सहकारी शिक्षक नितीन धुंदे, वैभव पुराणिक, राजेश कुळकर्णी, सुरेखा चौधरी, रजनी चौधरी, आशिष सैतवाल, सुधीर भोळे यांची उपस्थिती होती. डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, भारतात सुमारे सात लाख खेडी असून त्यांचा विकास झाला तरच भारताचा विकास झाला असे म्हणता येईल. त्यामुळे खेड्यांनी जगण्याबरोबर शक्तिशाली व समृद्ध होण्याची गरज आहे. कोणतेही काम कमी प्रतीचे न समजता श्रमाची प्रतिष्ठा जोपासवी. कारण श्रमाचे महत्त्व संपत्तीपेक्षाही मोठे आहे. श्रम व स्वावलंबनातून स्वतःला सुखी करता येते. आरोग्य शिक्षणाबरोबरच शिक्षणाकडेही लक्ष देऊन त्यांचा सुरेख संगम साधावा, असेही ते म्हणाले. मुख्याध्यापक सुरेश शिंदे म्हणाले की, एकदिवशीय समाजसेवा शिबिरात महाराणा प्रताप विद्यालयातील सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांनी भुसावळ येथून सायकलीने गोजोरे जिल्हा परिषद शाळेत येऊन शाळा व गावाची स्वच्छता केली. तसेच गावातील मंदिरांची स्वच्छता करून मंदिरांच्या कळसावर नवीन झेंडे लावले. दुपारच्या सत्रात विविध विषयांवर गटचर्चा घेऊन विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिबिराविषयीचा अनुभव सुदर्शन वानखेडे व शिवतेज गिरणारे यांनी व्यक्त केला. कैलास गायकवाड व राजेश कुळकर्णी या शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून शिबिरातील महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख केला. सूत्रसंचालन सुरेखा चौधरी यांनी तर आभार योगेश जोशी यांनी मानले. शिबिराला गोजोरेचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळा व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





















