जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास केवळ १०० मिटर अंतरात ४ रिक्षांचे प्रत्येकी दोन चाके काढून अनोळखी चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगर – दुध फेडरेशन रोडवरील खडके चाळ व इंद्रप्रस्थ नगरमधील नामदेव नगर परिसरात दि.१३ रोजी मध्यरात्री २ ते ५ वाजेदरम्यान काही अनोळखी चोरट्यांनी नामदेव नगर परिसरातील १०० मीटर अंतरात असलेल्या चार रिक्षांचे प्रत्येक दोन चाके काढून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत अफसर शेख सत्तार(वय२४), प्रमोद मांडोळे,(वय ३५), महेंद्र पाटील, शाहरुख शेख यांच्या रिक्षांचा समावेश आहे. पहाटेच्या सुमारास रिक्षाचालक रिक्षा काढून जात असतांना हा प्रकार आढळून आला त्यावेळेस एकाच गल्लीत दोन रिक्षांची चाके काढली होती तर त्यापुढील गल्लीत अशीच घटना घडली होती.
MH.19.CW.2194, MH.19.C.5558, MH.19.CW.2999, MH.19.V.5658 या घटनेत एका रिक्षा चालकाचे किमान ४ हजार ते ५ हजारपर्यत नुकसान झाले आहे. असे एकूण २० हजारापर्यतची रिक्षाची चाके घेवून चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहे. सकाळी ७ वाजेच्या सुमारास काही रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती.
यानंतर किशोर निकुभ हे घटनास्थळी येवून काही परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी देखील करीत होते. शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा जळगाव शहर पोलिसात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे परिसरातील रिक्षाचालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच परिसरात गेल्या तीन महिन्या आधी सुद्धा अशी घटना घडली होती. या परिसरात अशा छोट्या मोठ्या चोरीच्या घटना सुरूच असतात. तर पोलिसांची गस्त सुद्धा या भागात वाढवावी अशी देखील मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.