एरंडोल : प्रतिनिधी
शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जाणाऱ्या अंजनी नदी काठावरील कासोदा दरवाज्यापासुन ते श्रीमहादेव मंदीरापर्यंतचा रस्ता विकासासाठी शहरवासियांची मोठी मागणी होत होती. ह्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्यामुळे इतर दिवसांसह पावसाळ्यात नदीचे पाणी रस्तावर येवून दुर्गंधी पसरणे, मोठे-मोठे खड्डे यांसह इतर समस्यांनी नागरीक त्रस्त झाले होते. ह्या रस्त्याची दुरूस्ती व्हावी यासाठी नागरीक सतत आमदार चिमणराव पाटील यांचेकडे मागणी करित होते. ह्या रस्त्याची तातडीने दुरूस्ती व्हावी व नागरीकांना उद्भवणाऱ्या समस्या दुर व्हाव्यात यासाठी आ. पाटील राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरावा करीत होते.
याची मा.मंत्री महोदयांनी दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्र. नपावै-२०२२/प्र.क्र. ६६(अ-८६)/ नवि-१६ दि.३० मार्च २०२२ या आदेशान्वये वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत एरंडोल नगरपरिषद हद्दीतील अंजनी नदीच्या काठावरील कासोदा दरवाज्यापासुन ते श्रीमहादेव मंदीरापर्यंत रस्ता, संरक्षण भिंत, विद्युतीकरण, वृक्षारोपणासह सुशोभिकरण करणेसाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. या निर्णयामुळे एरंडोल शहरवासियांची दैनंदिन मोठी समस्या दुर होणार असल्याने मतदारसंघाच्या वतीने आ. चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तसेच एरंडोल शहरवासियांनी आनंद व्यक्त करत आ. चिमणराव पाटील यांचे आभार मानले आहे.