
जळगाव मिरर | ४ जून २०२४
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खान्देशचे पुत्र व राज्याचे माजी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी देखील भाजपकडून उमेदवारी दाखल केली होती. निकम यांच्या उमेदवारीविरोधात महाविकास आघाडीने माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना रिंगणात उतरविले होते. आज सुरू असलेल्या मतमोजणीत आघाडीवर असून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यास तिसरा खासदार मिळणार का ? याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.
भारतीय जनता पक्षाने मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून खान्देशचे पुत्र उज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मंत्री वर्षा गायकवाड या रिंगणात होत्या. हा मुकाबला अतिशय चुरशीचा झाला. यात पहिल्या टप्प्यात वर्षा गायकवाड यांना आघाडी मिळाली होती. यानंतर मात्र निकम यांनी सातत्याने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
सध्या फक्त प्राथमिक कल समोर आले असून संपूर्ण निकाल येण्यासाठी मोठा अवधी बाकी आहे. मात्र आतापर्यंत मिळालेली सुमारे २३ हजार मतांची आघाडी ही टिकवून वाढविली तर उज्वल निकम यांचा विजय होऊ शकतो. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तिसरा खासदार मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, ही बाब निकालाच्या नंतरच स्पष्ट होणार आहे.




















