
जळगाव मिरर | ६ जुलै २०२४
राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत आहे. नुकतेच शिंदे गटाचे नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी थेट राहुल गांधी व ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आलेली सूज विधानसभा निवडणुकीत उतरेल तसेच त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊत कुबुद्धीचा माणूस आहे असे ते म्हणाले आहेत. प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, ”हे भूत आमच्यामुळे निवडून आले, त्यांना स्वतःला पोरं होत नाहीत म्हणून दुसऱ्याच्या पोरांना दत्तक घेण्याची धडपड आहेत. ते कुबुद्धीचा माणूस असून त्यांना कधीच सुबुद्धी येणार नाही. या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार असून त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला लागणाऱ्या 23 मतांच्या कोटा एवढी मते आम्ही जुळवले”, असे गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हंटले आहे. तसेच यावेळी बोलतांना राहुल गांधींच्या वारीतील सहभागावर गुलाबराव पाटील म्हणाले, ”त्यांना विठ्ठलाला काहीतरी मागायचे असेल. आम्ही मात्र देवाने दिले तरी येतो आणि नाही दिले तरी येतो. मी गेले 31 वर्षे अखंड वारी करीत असून आम्हाला देवाजवळ काही मागायचे नसते. लोकसभेचे निकाल हे असे का आले, हे सगळ्यांना माहित असून ही फक्त सूज आहे, जी येत्या विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा टोला विरोधकांना लगावला.
तसेच ”आम्ही लोकसभेला 400 पार गेलो तर संविधान बदलणार असा प्रचार केला गेला. विधानसभेला होणारे मतदान हे वैयक्तिक संबंध आणि केलेल्या कामावर मिळत असते. माझ्या मतदारसंघात 80 टक्के मुस्लिम आणि 90 टक्के दलित समाज मला मतदान करतो, तुम्ही केव्हाही जाऊन तपासा” असाही दावा पाटलांनी यावेळी केला आहे.





















