जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२५
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहिण’ योजना आणली होती. हि योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना दिल्या जाणाऱ्या पैशामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यातच लाडक्या बहिणी योजनेमुळेच राज्यातील मतदारांनी महायुतीला भरघोस मतदान केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेचे निकष बदलले जाणार असल्याचा आरोप केला जातोय. मात्र, असे कोणतेच निकष बदलणार नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, निकषामध्ये बसत नसणाऱ्या महिला आता स्वतःहून पुढे येत आहेत. या योजनेतील सुमारे चार हजार महिलांनी योजनेतून नाव काढण्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये निकषात न बसणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेण्याची कोणतीच योजना किंवा तसा कोणताच विचार नसल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते. मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्याआधीच राज्यभरातील सुमारे 4000 पेक्षा अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज दाखल केला आहे.
राज्य सरकारच्या वतीने निवडणुकीच्या आधी घोषित करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून मोठ्या संख्येने महिलांनी यात अर्ज केले होते. मात्र निकषात बसत नसलेल्या अपात्र महिलांच्या वतीने देखील अर्ज करण्यात आले होते. राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता सरसकट अर्ज भरणाऱ्या महिलांना लाभ दिले होते. मात्र आता पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला या योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तवला जात होता. तत्पूर्वीच सुमारे 4000 महिलांनी योजनेतून आपली नावे मागे घेतली आहेत.
राज्य सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची शक्यता असणाऱ्या महिलांनी आतापर्यंत मिळालेले पैसे देखील आपल्याला परत करावे लागतील, या भीतीपोटी लेखी अर्ज देऊन योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला आहे. पडताळणी मध्ये अपात्र ठरल्यास मिळालेल्या लाभाची रक्कम दंड सहित वसूल करण्यात येण्याची भीती या महिलांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींनी आता अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.
