
जळगाव मीरर | २० एप्रिल २०२५
ग्रामपंचायत करपट्टी वसुलीमध्ये सुसूत्रता आणता यावी,गैरव्यवहार टाळता यावे आणि कॅशलेस पद्धतीने डिजिटल वसुली होऊन पंचायती आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम व्हाव्यात म्हणून मूळ येथील रहिवाशी गौरव विवेक ठाकरे व सोबतच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अजिंक्य डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे एक नाविन्यपूर्ण प्रबंध तयार करून सादर केला असता ‘इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ इनोव्हेशन्स इन इंजिनिरिंग अँण्ड टेक्नॉलिजी’ मार्फत हा प्रबंध स्वीकारण्यात येऊन प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शासनाच्या विविध योजनांशिवाय करवसु्लीतून मिळणारे उत्पन्न हे पंचायतींसाठी हक्काचे व विकास कामांना चालना मिळणारे मोठा स्रोत असणारे माध्यम आहे. राज्यातील ग्रामपंचायतींपुढे करपट्टी वसुलीचे मोठे आव्हान आहे.अद्याप सुद्धा गावांची करपट्टी वसुली डिजिटल न झाल्याने दरवर्षी करपट्टीच्या थकबाकीचा आकडा हा डोंगरासारखा वाढतच आहे.यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा व मनुष्यबळाच्या भरोस्यावर चालणाऱ्या या प्रक्रियेत सुसूत्रता यावी म्हणून गौरव ठाकरे व त्याच्या कॉलेजमधील वेदांत वाघुंदे,श्रेयस चिकणे,सायली शिलवंत,तन्मय पाडळे या सहकारी मित्रांनी कॉलेजच्या प्राध्यापिका नीता पवार यांच्या मार्गदर्शनाने प्रकल्पाचा विविध ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन करवसुलीबाबत केलेल्या अभ्यासाचा एक प्रबंध (जर्नल) सादर केला होता. कॉलेजमार्फत हा प्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत ‘आयआरजेआयईटी’ या मोठ्या संस्थेने स्विकारून प्रकाशित केला आहे. पुण्यात कॉम्पुटर सायन्स या विषयात इंजिनिअरिंग करताना सुद्धा ग्रामीण भागासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा,ही तळमळ मनात ठेवत ग्रामपंचायत करपट्टी वसुलीसाठी नावीन्यपूर्ण शोध प्रबंध प्रकाशित झाल्याबद्दल गौरव ठाकरे व त्याच्या सहकारी मित्रांचे याबद्दल कौतुक होत आहे.
❝ माझे वडील विवेक ठाकरे हे आमच्या गावाचे माजी उपसरपंच व अ.भा.सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीवरून मी माझ्या सहकारी चमूशी चर्चा करून ग्रामपंचायत कर वसुलीमध्ये सुसूत्रता यावा व ठोक वसुली व्हावी,यासाठी काम करण्याचे ठरवले.एकट्या आमच्या गावच्या ग्रामपंचायतची करपट्टीची थकबाकी सुमारे 2 कोटी रुपये आहे.गावाच्या घरपट्टी,पाणीपट्टी मालमत्ताकर व इतर सुविधांपोटी ग्रामपंचायतींना करवसुलीतून स्वनिधी म्हणून एक मोठे उत्पन्न मिळत असते. पण राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींची करपट्टी वसुली ही सालाबादप्रमाणे दरवर्षी थकबाकीच्या स्वरूपात वाढतच आहे.आज रोजी ढोबळ निष्कर्ष काढल्यास राज्याचा ग्रामपंचायतींचा करपट्टीचा थकबाकीचा हा आकडा सुमारे 3 ते 4 हजार कोटी आहे,परंतु राज्याच्या ग्रामविकासाला गती देणारी ही खूप मोठी रक्कम आहे.नगरपालिका-मनपा यांची कराची रक्कम,दरमहा विजेचा वापर आणि मोबाईल रिचार्ज आदी भरणा जसा डिजिटल पद्धतीने होतो तसा आजही ग्रामपंचायतच्या वसुलीचा भरणा डिजिटलरित्या करता येत नाही.मनुष्यबळाच्या आधारे वसुली ही सध्या अत्यंत किचकट बाब आहे शिवाय त्यात गैरव्यवहाराचा वाव असल्याने आमच्या अभ्यास प्रबंधाचे राज्याच्या ग्रामविकास विभागाला आम्ही पुन्हा सादरीकरण करणार आहोत. शासनाने आमची अभ्यास प्रणाली लागू केल्यास ग्रामपंचायती आर्थिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. ❞
गौरव विवेक ठाकरे
[ विद्यार्थी,ग्रामपंचायत करवसुली अभ्यास प्रबंध





















