
जळगाव मिरर | ११ मे २०२५
राज्यातील साताऱ्याच्या फलटण तालुक्यात उज्जैनला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. त्यात 2 महिलांसह 3 जण ठार झालेत. ही घटना रविवारी पहाटे 2.30 च्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील एक खासगी बस (एमएच04 सीपी 2452) काही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघाली होती. ही बस शनिवारी रात्री वाठार स्टेशन मार्गे सालपे घाट उतरून लोणंदच्या दिशेने जात होती. ती बिरोबा मंदिराजवळ आली असता लोणंदहून साताऱ्याकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच 42 बीएफ 7784) तिला जोराची धडक दिली. त्यात बस चालक सलमान इम्तियाज सय्यद (24, रा. मालबाग पाटील गल्ली, शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व रजनी संजय दुर्गुळे (48, रा. पेठ वडगाव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे दोघे जागीच ठर झाले. तर अन्य एका गंभीर जखमी महिलेचा सातारा सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोणंद पोलिसांनीही ही गोष्ट कळवली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना लोणंद स्थित खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत नेमके कितीजण जखमी झाले? त्याची माहिती समजली नाही. पण स्थानिक रुग्णालयात काही जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, बीडच्या पाटोद्यालगत झालेल्या एका विचित्र अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. अश्फाक शेख (40) व त्यांचा मुलगा अल्ताफ शेख (15) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही पुण्याहून आपल्या गावी म्हणजे केजच्या दिशेने येत होते. रस्त्यात त्यांची कार पाटोद्याजवळ पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकली. त्यानंतर ती 3 पलट्या खाऊन समोरून येणाऱ्या एका खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर ते पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे गत काही वर्षांत महाराष्ट्रातील रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढले आहे. 2020 पासून आतापर्यंत राज्यात 1 लाख 59 हजार रस्ते अपघात झालेत. त्यात सुमारे 71 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. 2020 मध्ये 24 हजार 971 अपघात झाले, त्यात 11 हजार 569 जणांचा बळी गेला. तर 2024 मध्ये 36 हजार 84 अपघातांमध्ये 15 हजार 335 लोकांचा मृत्यू झाला आहे.




















