
जळगाव मिरर | १४ जून २०२५
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना आज सकाळी मुंबईच्या गोवंडी परिसरात एक भीषण अपघात घडला असून, डंपरने तीन तरुणांना चिरडले. या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही वेळातच मोठा जमाव जमला. संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. लोकांनी डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवर घडली. एका भरधाव डंपरने तिघांना चिरडले. अपघातानंतर जमावाने या मार्गावर काही काळ ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला. यावेळी डंपरच्या काचा फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे या मार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
जमावाच्या ठिय्या आंदोलनामुळे विक्रोळी व घाटकोपरकडून येणारी वाहने तसेच नवी मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे थांबली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलिस दाखल आहेत. संतप्त जमावाला समजावून ठिय्या आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले. या भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहे.
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बॅरिकेड्स लावून तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. चालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.





















