जळगाव मिरर | २७ जून २०२५
आई वडील कामाला गेलेले होते तर भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेला होता. यावेळी घरात एकटयाच असलेल्या श्रीकांत मोहन धनगर (वय २१, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्टस असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा गावात श्रीकांत धनगर हा आईवडील आणि भाऊ जय यांच्यासोबत वास्तव्याला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळीच श्रीकांतचे आईवडील कामाला गेलेले होते, तर भाऊ जय हा कामानिमित्त बाहेर गेलेला होता. त्यामुळे श्रीकांत हा घरी एकटाच होता, याचवेळी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी १२ वाजता त्याचा भाऊ जय हा घरी आला, त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला.
भाऊ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच जयने एकच आक्रोश केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी मृतदेह खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता त्याला मयत घोषित केले. तरुणाच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात आई उज्वला, वडील मोहन धनगर आणि भाऊ जय असा परिवार आहे.
