जळगाव मिरर | २८ जून २०२५
राज्यातील अनेक शहरात खळबळजनक घटना घडत असतांना आता वर्धा येथून एक थरारक घटना उघडकीस आली आहे. शेतीच्या धुऱ्याच्या अर्थात बांधाच्या वादावरून 3 जणांचा बळी गेल्याची भयंकर घटना वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात घडली आहे. या प्रकरणात आरोपीने प्रथम आपली काकू व चुलत भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून मृत्यूला जवळ केले. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव महेंद्र मोहिजे असे होते. त्याने साधना सुभाष मोहिजे (55) व त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (27) या दोघांची कुऱ्हाडीने हत्या केली. या तिघांमध्ये गत काही दिवसांपासून शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून वाद सुरू होता. गावातील काही जमिनी ठेक्याने लावण्यावरूनही त्यांच्यातील तणाव वाढला होता. शुक्रवारी सकाळी हा वाद एवढा टोकाला गेला की, महेंद्र मोहिजेने संतापाच्या भरात नितीनी व त्याची आईवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. त्यानंतर काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव गेतली. पोलिस अधीक्षक अनुराग जैन व अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल चौहन हे ही तातडीने निमसडा येथे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी हे हत्याकांड शेतीचा मालकीहक्क व उत्पन्नाच्या वाटणीवरून झाल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी पोलिस मृतांचे शेजारी व नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेत आहेत.
