जळगाव मिरर | ३० जून २०२५
राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चाॅकलेट खाण्यासाठी पैसे मागितल्याने निर्दयी जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. आरुषी बालाजी राठोड (४, रा. भीमातांडा, ता. उदगीर) असे मृत मुलीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मृत मुलीचा बाप हा नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्या त्रासाला वैतागून आपल्या मुलांसह माहेरी लिंबोटी, माळेगाव (ता.लोहा जि.नांदेड) येथे राहायला गेल्या होत्या. बालाजी राठोड याने पत्नीच्या माहेरी जाऊन बायकोसोबत भांडण काढून ९ जून रोजी जबरदस्तीने न ऐकता एकट्या आरुषी या मुलीला भिमातांडा येथे आणले. तेव्हापासून ही चार वर्षीय मुलगी बापासोबत राहात होती.
दरम्यानच्या काळात मुलीला आई जवळ सोड म्हणून नातेवाइकांनी सांगितले तरीसुद्धा तो कोणाचेही ऐकत नव्हता. रविवारी दुपारी मृत मुलगी आरुषी हिने चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितले या कारणावरुन चिडलेल्या बापाने साडीने गळा आवळून फाशी देवून चिमुरडीला ठार मारले. मृत मुलीची आई वर्षा व बालाजी राठोड (३० रा. भीमा तांडा ता उदगीर) यांच्या तक्रारीवरू उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम १०३(१) भारतीय न्याय संहीता २०२३ नुसार खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली.
