जळगाव मिरर | ८ जुलै २०२५
सकाळी झोपेतून उठल्यानंतर घराजवळ मित्रांसोबत वेळ घावला. त्यांनतर घरी जावून झोपलेल्या सागर अशोक नन्नवरे (वय २०, रा. समता नगर) या तरुणाचा झोपेतच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास समता नगरात घडली. मुलाच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबियांसह मित्रांना मोठा धक्का बसला असून तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सागरच्या मित्रांनी व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात राहणारा सागर नन्नवरे हा पेंटिंगचे काम करत होता. रविवारी रात्री तो नेहमीप्रमाणे कुटुंबियासोबत जेवण केले आणि त्यानंतर झोपला. सकाळी त्याची आई सुनीता नन्नवरे कामावर गेल्यानंतर सागर झोपेतून उठला. त्याने गल्लीत चक्कर मारली आणि काही मित्रांसोबत वेळ घालवला. त्यानंतर तो पुन्हा घरी येऊन झोपी गेला. सोमवारी सकाळी १० वाजता सुनीता नन्नवरे कामावरून घरी आल्या. मुलाला कामाला उशीर होत असल्याचे सांगत त्यांनी सागरला उठवण्यासाठी हाक मारली. मात्र, सागरने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सागरची आई त्याला उठविण्याकरीता त्याच्याजवळ गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्या घाबरल्या. त्यांनी तात्काळ बाहेर येऊन सागरच्या मित्रांना याची माहिती दिली. सागरच्या मित्रांनी कोणताही वेळ न घालवता त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून सागरला मृत घोषित केले.
एकुलत्या एक मुलाच्या अकस्मात मृत्यूने आई-वडिलांना मोठा धक्का बसला. सागरचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. सागरच्या पश्चात आई सुनीता नन्नवरे, वडील अशोक नन्नवरे आणि एक बहीण असा परिवार आहे. सागरची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असून त्याचे आई-वडील हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सागरच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
