
जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२५
१५ ऑगस्ट रोजी देशभर स्वातंत्र्यदिनानिमित्ताचा उत्साह सुरु असतांना जालना येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यादरम्यान, पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलनकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे कौटुंबिक वादातून एका महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. त्यांनी पोलिसांवर आरोपींना सहकार्य करत असल्याचा आणि फिर्यादींना त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.
पंकजा मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. याचवेळी पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलनकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनावर टीका केली जात आहे. अगदी फिल्मी स्टाइल पद्धतीने या पोलिस अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्याला मागून पळत येत लात घातली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलनकर्त्यांना पोलिस घेऊन जात असताना डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी मागून पळत येत उडी मारत कंबरेत लात घातली. यावरून पोलिसांच्या या वर्तनावर टीका केली जात आहे.
गोपाल चौधरी नामक व्यक्ति गेल्या मागील 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीने परपुरुषासोबत पळून जाऊन लग्न केले आहे. मात्र, तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी पैसे खाल्ल्याने कारवाई न झाल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पंकजा मुंडे येणार आहेत तेव्हा आम्हाला त्यांना भेटू द्या अन्यथा आत्मदहन करू असा इशारा आंदोलकाने दिला होता.
तसेच या आंदोलकाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर रॉकेल टाकल्याने आम्हाला बळाचा वापर करावा लागल्याचे स्पष्टीकरण लात मारणारे पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिले आहे. ते म्हणाले, कौटुंबिक वादातून त्यांच्या पत्नीने त्यांना सोडले असून त्यांच्या पत्नीने अमरावती येथील एका व्यक्तीसोबत लग्न केले आहे. त्यामुळे हे प्रकरण त्या जिल्ह्यातले असल्याचे आम्ही त्यांना अनेकवेळा सांगितले होते. तसेच आदल्या रात्री या आंदोलकानेच पोलिस ठाण्यात येऊन एका पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा दावा देखील कुलकर्णी यांनी केला आहे. परंतु, पोलिस ठाण्यात येऊन जर हल्ला केला होता तर अटक का करण्यात आली नाही तसेच आंदोलनाला परवानगी तरी कशी मिळाली असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले, फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलकाला लाथ मारणे, हे पोलिसांना शोभते का? पालकमंत्र्यांसमोर चमकोगिरी करणाऱ्या पोलिसाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकाला लाथ मारून बाजूला केलं, हे करतांना त्यांना खूप कर्तव्य बजावत असल्याचे वाटतं का? स्वातंत्र्यदिनी जालन्यात झालेला हा प्रकार म्हणजे पोलिसांची माजोरडी वृत्ती दिसते. पालकमंत्र्यांसमोर आम्ही किती काम करतो हे दाखवताना सामान्य माणसाला लाथ मारणे हा त्या खाकी वर्दीचा अपमान आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तुम्हाला पटत नाही म्हणून लाथ मारणे चूक आहे. गृहमंत्र्यांनी या माजोरड्या पोलिसावर कारवाई करावी, म्हणजे पोलिस दलात कुणालाही सामान्य जनतेला लाथ मारण्याची हिंमत होणार नाही.





















