
जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२५
गेल्या चार दिवसापासून मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईत आंदोलन सुरु असून आता राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आझाद मैदानाऐवजी वानखेडे स्टेडियम उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मराठा आंदोलकांसाठी आझाद मैदान अपुरे पडत आहे. त्यामुळे त्यांना वानखेडे स्टेडियम उपलब्ध करून द्यावे, असे मनसेने म्हटले आहे. यावेळी मनसेने मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर केलेली टीकाही फेटाळून लावली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आज मनसैनिकांना मराठा बांधवांना सर्वोतपरी मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे स्वरुप पाहता आंदोलकांना आझाद मैदानाऐवजी वानखेडे स्टेडियम उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ते म्हणाले, सरकारने मराठा आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा. आंदोलकांसाठी आझाद मैदानाची जागा कमी पडत आहे. मराटा बांधवांची इतरत्र व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना मुंबईतील वानखेडे स्टेडियम उपलब्ध करून द्यावे. असे झाले तर त्यांना एकाच ठिकाणी हवी तेवढी जागा मिळेल.
राज ठाकरे यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. ते स्पष्ट बोलतात. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असे नसते. आज अमित ठाकरे यांनीही मनसैनिकांना मराठा बांधवांना सर्वोतपरी मदत करण्याची सूचना केली. हे लोक आपले आहेत. त्यांचा लढा सुरू आहे. त्यांना मदत करा. त्यांना काहीही कमी पडू देऊ नका असे ते म्हणालेत. तशा सूचना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. माझी मनोज जरांगे पाटील व मुंबईत आलेल्या आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवू देऊ नये. त्यांनी या प्रकरणी योग्य ते नियोजन करावे.
गणेशोत्सवाच्या काळात कुणालाही कोणतीही अडचण होऊ नये हा विचार त्यांनी करावा. सरकार या प्रकरणी काही कमी पडतेय का? यावर बोलणे योग्य ठरणार नाही. गणेशोत्सवाच्या काळात काही ताण असतो, पण सरकार कमी पडत असे नाही. कारण ते ही आपल्या पातळीवर काम करत आहे. त्यांनी या आंदोलनावर सकारात्मक मार्ग काढावा अशी आमची मागणी आहे. प्रस्तुत आंदोलनासाठी राज्यभरातील बांधव आलेत. त्यांना परवानगी देण्यात आली आहे. पण कोर्ट हेच सर्वस्व आहे. न्यायालयात लवकर निर्णय होईल आणि मुंबईत आलेले मराठा बांधव आनंदात परत जातील, असा विश्वासही बाळा नांदगावकर यांनी यावेळी व्यक्त केला.
मनोज जरांगे हे पुन्हा मुंबईत का आले? या प्रश्नाचे उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर मनोज जरांगेंनी त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. ते म्हणाले होते, राज्यातील समाजाचे म्हणणे आहे की, हे दोन्ही भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतो. त्याला आम्ही कधी विचारले का की, 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले? त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात केव्हा आला? आम्ही तुला विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला?
तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे, तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारले का? देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला तुझा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुझा पोरगा त्यांनी पाडला. त्यानंतरही तू त्यांची री ओढतो. राज ठाके कुचक्या कानाचा आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला, सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालते. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचे म्हणतात, असे ते म्हणाले होते.





















