
जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५
अतिवृष्टी आणि पुरामुळे धाराशिव जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. हजारो हेक्टरवरील शेतांची पिकं वाहून गेली असून शेतकरी आणि सामान्य जनतेची परिस्थिती गंभीर आहे. तरीही, जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांचा नाचगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन जनतेत आणि राजकीय पक्षांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना आणि जनजीवन विस्कळीत असताना जिल्हाधिकारी तुळजापुरातील एका नवरात्र कार्यक्रमात डान्स करताना दिसले. यामुळे नागरिकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये प्रशासनाच्या संवेदनहीनतेबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर सरकारवर टीका करत जिल्हाधिकारी व प्रशासनाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “धाराशिवमध्ये लोकांचे संसार वाहून गेले, शेतकऱ्यांची कमाई पावसात बुडाली. इतक्या गंभीर परिस्थितीत जिल्हाधिकारी नाचत आहेत, यावरून त्यांना परिस्थितीची किती जाणीव आहे हे स्पष्ट होते.” त्यांनी अधिक म्हटले, “शेतकरी रडत असताना अधिकारी नाचत असल्याने प्रशासनाकडे कोणतीही जबाबदारी नाही असं दिसून येत आहे.”
काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या व्हिडिओवरून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर होण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सरकारने आपल्या प्रशासनाच्या भूमिकेकडे गांभीर्याने पाहावे, असा सुद्धा आग्रह केला आहे. सध्या धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत मदतकार्य अपुरे असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाची कामगिरी प्रश्नाखाली आली असून, जनतेतून प्रशासनाच्या विरोधात संतापाचा सूर वाढत आहे.




















