
जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२५
पाचोरा तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीने एक दुःखद घटना समोर आली आहे. शहरातील कृष्णापुरी टेकडी गल्लीत असलेल्या धाब्याच्या घराचा मागील भाग सोमवारी दुपारी अचानक कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून महेश नितिन राणे (वय १२) या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मावसभाऊ योगेश बाळू पाटील हा जखमी झाला आहे. महेश हा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते. आता या दुर्घटनेने वृध्दपकाळातील आईचा एकमेव आधारही हिरावल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेकडी गल्लीत विठ्ठल काशिनाथ पाटील यांच्या धाब्याच्या घरात चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथून आलेला महेश आपल्या मावसभावासह राहत होता. शिक्षणासाठी त्याला आईने येथे पाठवले होते. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महेश व योगेश घराच्या मागील बाजूस झोपले असताना अचानक मागचा भाग कोसळला. माती व लाकडांच्या ढिगाऱ्याखाली दोघेही दबले. विठ्ठल पाटील व चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ शेजारी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी महेशला मृत घोषित केले, तर योगेशवर उपचार सुरू आहेत.
महेशचे वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते. विधवा आईने दोन मुलींसह लोंढे येथे राहात आपल्या एकुलत्या एक मुलाला शिक्षणासाठी पाचोऱ्यात मावसभावाकडे पाठवले होते. आपल्या वार्धक्यात महेशच आधार बनेल, अशी आशा तिची होती. मात्र, नियतीने तिच्याकडून तोही हिरावून घेतल्याने ती कोलमडून पडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून, नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुल पवार, सहाय्यक निरीक्षक संजय निकम, तलाठी श्रीमती चौधरी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माजी नगरसेवक विकास पाटील, किशोर बारवकर, अनिल येवले, भोला पाटील यांनीही धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या भिंतीत पाणी झिरपल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अशा घरांची वेळेवर पाहणी न होणे व जुन्या धाब्यांच्या घरांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हे देखील याला कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.




















