
जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२५
मतदार याद्यांमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याच्या काही वेळ आधीच ही घटना घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील कथित त्रुटींविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्ते सकाळी ११ वाजल्यापासून कळवा स्थित निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी मतदार याद्यांमधील गंभीर त्रुटींवर आक्षेप घेत आंदोलन सुरू केले होते. मतदार यादीत अनेक मतदारांची नावे दुबार नोंदलेली, तसेच हयात नसलेल्या व्यक्तींची नावे अद्याप यादीत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय जिथे सपाट जमिनी आहेत, तिथे इमारती दाखवून मतदार नोंदणी करण्यात आल्याच्या तक्रारीही मनसे कार्यकर्त्यांनी मांडल्या.
या सर्व मुद्द्यांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता, समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून केवळ “तुमचे प्रश्न सोडवले जात आहेत” असे सांगून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यातच निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइटही बंद असल्याने कार्यकर्त्यांचा संताप अधिकच वाढला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता तसेच कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे.




















