
जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२६
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी ८.४६ वाजता विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या अकस्मात घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. २९ जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात सर्वपक्षीय नेते, लाखो समर्थक आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेनंतर आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते व अजित पवारांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी अपघातापूर्वी अजित पवारांशी झालेल्या शेवटच्या फोन संभाषणाची ध्वनिमुद्रिका प्रसारमाध्यमांसमोर ऐकवली.
श्रीजीत पवार यांनी सांगितले की, २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी त्यांनी अजित पवारांना एका विषयासंदर्भात मेसेज पाठवला होता. विमान प्रवासात असल्याने नेटवर्क उपलब्ध नव्हते. मात्र, विमान बारामतीच्या हद्दीत प्रवेश करताच नेटवर्क मिळाले आणि सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी अजित पवारांनी स्वतः फोन करून त्या मेसेजला उत्तर दिले. काही मिनिटे दोघांमध्ये संभाषण झाले आणि अवघ्या नऊ मिनिटांत, म्हणजेच सकाळी ८.४६ वाजता विमान अपघाताची दुर्घटना घडली.
या शेवटच्या संभाषणात जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीच्या संदर्भात चर्चा झाल्याचे श्रीजीत पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी या वेळी “आपण सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणार असून, सर्वांना न्याय देण्याचं काम करू,” अशी भूमिका मांडली होती. तसेच, माळी समाजाला जिल्हा परिषद उमेदवारी दिल्याचा उल्लेख करत इतर पक्षांनी अशी संधी दिली नसताना आपण ती दिल्याचेही त्यांनी फोनवर सांगितले.
श्रीजीत पवार यांच्या मते, हा कॉल विमान लँडिंगच्या तयारीत असतानाच झाला होता. सकाळी ८.३७ पर्यंत संभाषण सुरू होते आणि त्यानंतर काही मिनिटांतच दुर्घटना घडली. त्यामुळे हा फोन कॉल अजित पवारांचा अपघातापूर्वीचा शेवटचा संवाद ठरल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही ध्वनिमुद्रिका उपस्थितांना ऐकवून त्या संभाषणाचा संदर्भ स्पष्ट केला.
अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभरातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत सर्वसमावेशकतेवर दिलेला भर या शेवटच्या संभाषणातूनही स्पष्टपणे दिसून येतो, असे श्रीजीत पवार यांनी सांगितले. जिल्हा परिषद उमेदवारीसारख्या स्थानिक राजकारणातील विषयावरही सर्व समाजघटकांचा विचार करण्याची त्यांची भूमिका अखेरपर्यंत कायम होती, असे त्यांनी नमूद केले.




















