जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२६
शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारेगाव–कान्हूर मेसाई गणातून निवडणूक लढवलेल्या नवले यांचा पराभव भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी 300 मतांनी केला.
निर्मला नवले सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत; त्यांच्या रिल्स, व्हिडीओ आणि वेगळ्या स्टाईलमुळे त्यांना ‘रिल्सची राणी’ अशी ओळख मिळाली आहे. आयटी इंजिनिअरिंगमधील शिक्षण, सक्रिय राजकीय सहभाग आणि सामाजिक माध्यमांवरील प्रभाव असूनही या वेळेस त्यांची लोकप्रियता प्रत्यक्ष मतांमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही.
पुणे जिल्हा परिषदेच्या 299 जागांपैकी आतापर्यंत 73 जागांचे निकाल समोर आले असून, भाजपला 20, राष्ट्रवादी काँग्रेसला 27, शिवसेना 7, ठाकरे गट 2 आणि शरद पवार गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत मोठ्या सभांचा अभाव आणि थंड प्रचार यामुळे कारेगाव–कान्हूर मेसाई गणात नवले यांचा पराभव विशेष लक्षवेधी ठरला. या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणूक यामध्ये फरक असतो, आणि फक्त ऑनलाइन फॅन फॉलोअिंगने मत मिळवता येत नाही.




















