भारतातील किशोरवयीन मानसिक आरोग्यावरील अहवाल सांगतात की परीक्षा काळात मुलांमध्ये चिंता, नैराश्य आणि भीती लक्षणीय वाढते. अनेकदा मुलांना अपयशापेक्षा पालकांची निराशा अधिक भीतीदायक वाटते. “मी कमी पडलो तर आई-बाबा नाराज होतील का?” हा प्रश्न त्यांच्या मनात असतो.
भारतीय कुटुंबपद्धतीत पालकांच्या अपेक्षा स्वाभाविक असतात; पण जेव्हा अपेक्षा दडपणात बदलतात, तेव्हा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. पालकांनी अभ्यासाची शिस्त ठेवताना भावनिक आधार देणे आवश्यक आहे. संवाद, प्रोत्साहन आणि अपयश स्वीकारण्याची तयारी हे मानसिक संरक्षण कवच आहे. यश हे दडपणातून नव्हे, तर सकारात्मक वातावरणातून जन्माला येते. म्हणूनच तणाव कमी करा, विश्वास वाढवा कारण मानसिक आरोग्यच खऱ्या यशाचा पाया आहे. भारतीय मानसशास्त्र परिषद (Indian Psychiatric Society) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या अहवालानुसार किशोरवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या तणावाचे एक प्रमुख कारण म्हणजे शैक्षणिक दडपण. राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) च्या आकडेवारीनुसार दरवर्षी अनेक विद्यार्थी परीक्षा किंवा शैक्षणिक अपयशाच्या भीतीमुळे टोकाची पावले उचलतात. ही वस्तुस्थिती केवळ आकडेवारी नसून, प्रत्येक घरासाठी इशारा आहे. परीक्षेच्या काळात मुलांच्या मनात “मी अपयशी ठरलो तर?” हा प्रश्न सतत घोंघावत असतो. झोप न लागणे, चिडचिड, भूक कमी होणे, आत्मविश्वास ढासळणे ही तणावाची स्पष्ट लक्षणे आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील संशोधनानुसार सततच्या मानसिक दडपणामुळे मेंदूतील एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. म्हणजेच जास्त ताण दिल्यास अपेक्षित यश मिळण्याऐवजी उलट परिणाम होऊ शकतो. परीक्षा म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका नव्हे; ती मुलांच्या मनातील भीती, अपेक्षा आणि आत्मसन्मानाचीही परीक्षा असते. बहुतांश घरात निकालाच्या आधीची रात्र तणावाने भरलेली असते; पण त्या तणावाच्या सावलीत एक नाजूक मन उभे असते आपलेच मूल. याठिकाणी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. पालक हे मुलांचे पहिले मानसोपचारतज्ज्ञ असतात. “इतरांच्या मुलांना इतके गुण आले, तू का नाही?” अशी तुलना मुलांच्या आत्मसन्मानावर आघात करते. प्रत्येक मूल वेगळे असते; त्याची बुद्धिमत्ता, आवड, शिकण्याची पद्धत भिन्न असते. तुलना नव्हे, तर समजून घेणे आवश्यक आहे. “गुणांपलीकडचा विश्वास म्हणजेच पालकांच्या साथीत यशाचा सुवास”
अनेकदा पालक आपल्या अपूर्ण स्वप्नांचा भार मुलांवर टाकतात. “डॉक्टरच व्हायचे”, “पहिलाच नंबर हवा” अशा अपेक्षा नकळत दडपण निर्माण करतात. मुलांसाठी गुणपिक्षा पालकांचा विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या मानसशास्त्रीय अभ्यासानुसार, ज्या मुलांना पालकांकडून सकारात्मक प्रोत्साहन मिळते, त्यांची कामगिरी अधिक स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण असते. पालकांच्या विश्वासाची सावली आणि त्याच्या प्रेमाची साथ तर परीक्षेत उमलते यशाची पहाट.” परीक्षा ही केवळ ज्ञानाची नव्हे, तर भावनिक संतुलनाचीही कसोटी आहे. घरातील वातावरण शांत, आश्वासक आणि प्रेमळ असेल तर मुलांचा ताण निम्मा होतो. अपयश आले तरी “आपण तुझ्यासोबत आहोत” हा संदेश त्यांना नव्याने उभे राहण्याची शक्ती देतो. परीक्षेत अपयश आले तरी ते आयुष्याचे अपयश नसते; पण त्या क्षणी पालकांचा कठोर शब्द मात्र आयुष्यभर जखम देऊ शकतो. उलट एक प्रेमळ स्पर्श, एक आश्वासक वाक्य “तू आमच्यासाठी गुणांपेक्षा मोठा आहेस” हे मूल पुन्हा उभे करू शकते.
गुणपत्रिकेवरील आकडे तात्पुरते असतात; पण त्या काळात दिलेला विश्वास कायमस्वरूपी ठरतो. पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, त्यांचे मन ऐकावे, त्यांच्या भीतीची थट्टा करू नये. अभ्यासाचे वेळापत्रक आखताना विश्रांती, खेळ आणि झोप यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. यश म्हणजे केवळ टक्केवारी नव्हे; तर आत्मविश्वास, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक दृष्टिकोन हे खरे यशाचे मापदंड आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना स्पर्धेपेक्षा समर्थ साथ हवी आहे. तणाव वाढविण्याऐवजी विश्वास दिला, अपेक्षांऐवजी आधार दिला, तर परीक्षा ही भीतीची नव्हे तर आत्मविश्वासाची पहाट ठरेल.
कारण शेवटी गुणपत्रिकेवरचे आकडे आयुष्य ठरवत नाहीत; पण त्या काळात पालकांनी दिलेला विश्वास मात्र आयुष्यभराची ताकद बनतो. स्पर्धेच्या या युगात मुलांना धावायला शिकवण्यापूर्वी त्यांना पडल्यावर उभे राहायला शिकवूया. मुलांना दडपण नव्हे, दिशा द्या. तुलना नव्हे, समजून घ्या. अपेक्षा नव्हे, आधार द्या. कारण तणाव मोडतो, विश्वास घडवतो.
-नंदलाल गादिया,
संचालक : महावीर क्लासेस, जळगाव




















