
जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६
दिवंगत नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. हा अपघात आहे की घातपात, असा संशय उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच संबंधित व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलनही केले.
मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदारांकडून रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत, “अजित दादांवर खरेच प्रेम असेल तर नाटक करण्याची गरज नाही. रोहित पवार काही तपास यंत्रणा नाहीत. त्यांच्या हातात पुरावे असतील तर ते थेट तपास यंत्रणांकडे द्यावेत,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, “रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे. त्यासाठी ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. “राज ठाकरे किंवा रोहित पवार काहीही बोलू देत; यंत्रणा योग्य तपास करतील आणि सत्य बाहेर येईल,” असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनीही रोहित पवारांवर टीका करत “हे नाटक करण्याची गरज नाही,” असे म्हटले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील, असेही अनिल पाटील यांनी सांगितले. या सर्व घडामोडींमुळे अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाभोवतीचे राजकारण अधिकच तापले असून, तपासाच्या निष्कर्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




















