
जळगाव मिरर | १५ मार्च २०२६
यावल तालुक्यातील वढोदा गावाजवळ अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचे अँगल तुटल्यामुळे ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत उत्तर प्रदेशातील एका वृद्ध बोरवेल कामगाराचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळच्या सुमारास घडला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वढोदा (ता. यावल) गावाजवळून अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्ग जातो. शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील काही बोरवेल कामगार ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून यावलच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी अचानक धावत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटल्याने ट्रॉलीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला कलंडून उलटली. त्यामुळे ट्रॉलीतील कामगार गंभीर जखमी झाले.
या अपघातात मुन्नू सिंह चौहान (वय ६२, रा. उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुकेश सिंह (वय ४५), केशव सुरेश चव्हाण (वय २०) आणि सुमित कुमार (वय २१, सर्व रा. उत्तर प्रदेश) हे तिघे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. तुषार सोनवणे, डॉ. रोहित कोळी, अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर आणि जॉन्सन सोरटे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. जखमींची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी करण्यात येत आहे.




















