
जळगाव मिरर | २२ मार्च २०२६
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, भोंदू बाबा प्रकरणावर फक्त हवेत बोलण्याचा काही अर्थ नाही, तर खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि त्याचा भांडाफोड सरकारनेच केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणात काही महिला लाजेखातर पुढे येत नाहीत, परंतु पीडित महिलांना त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन पुढे येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही महिलांनी आधीच प्रतिसाद दिला आहे. या प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी डीजीपी, एसआयटी आणि नाशिक पोलिस कमिशनर मिळून काम करत आहेत.
फडणवीस म्हणाले, “फोटो कुणाचेही असू शकतो, पण खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाच्याही सहभागाची माहिती पोलिसांकडे आहे. जेव्हा पुरावे पोलिसांकडे आहेत, तेव्हा त्यांचे काम सुरू आहे. मात्र, फक्त भेटल्यामुळे कोणालाही कारवाई होणार नाही. जर खरातांना 40 किलोमीटर पाण्याची लाईन दिली गेली असेल, तर त्या मंत्र्यांबाबत विरोधक का गप्प आहेत?”
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, सरकार आणि पोलिस जे काही करायचे आहे, ते कठोर पद्धतीने करतील. कोणत्याही गोष्टीला विनाकारण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. “महिलांवर झालेले अन्याय दूर करण्यासाठी चौकशी होईल आणि प्रत्येक महिलेला न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.





















